पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील भीषण रेल्वे अपघातामधील मृतांची संख्या आतापर्यंत २७५ झाली आहे. या दुर्घटनेत एक हजारांपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने या अपघातात मृतांच्या मुलांसाठी मोठी घोषणा केली आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. (Virender Sehwag on Railway Accident)
वीरेंद्र सेहवाग याने टिव्ट केले आहे की, "ओडिशा रेल्वे अपघाताचे फोटो आपल्याला दीर्घकाळ त्रास देतील. अपघातात ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी मी घेईन. मी अपघातग्रस्तांच्या मुलांना सेहवाग इंटरनॅशनल स्कूलच्या बोर्डिंग सुविधेत मोफत शिक्षण देण्याची घोषणा करत आहे. या दु;खद प्रसंगी एवढेच करु शकतो." (Virender Sehwag on Railway Accident)
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (दि.०२) तीन रेल्वे गाड्याची धडक होऊन भीषण अपघात झाला. आत्तापर्यंत सुमारे २७५ जणांचा मृत्यू झाला आहे, एक हजारांपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचे कारण समोर आले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, "या भीषण अपघाताचे कारण कळाले आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल करण्यात आल्याने हा भीषण अपघात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.