पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज अशी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची ओळख आहे. (Virat vs Babar) त्यामुळेच दोघांची तुलना होणही साहजिकच आहे. मागील काही दिवस विराट हा खराब फॉर्मला झूंज देत आहे. तो कमबॅक करण्यासाठी प्रचंड मेहनतही घेत आहे. तर दुसरीकडे बाबर आझम हा आपल्या करिअरच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये आहे. त्याचे कामगिरीतील सातत्य हे सर्वांनाच अचंबित करणारे आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये नेहमी तुलना होत असते. आता आशिया कप स्पर्धेत २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान हे आमने-सामने असणार आहेत. क्रिकेटमधील या महामुकाबल्यापूर्वी पुन्हा एकदा या दोन खेळाडूंमध्ये कोण भारी, अशी तुलना होत आहे. या प्रश्नाचे उत्तर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासीम आक्रम याने दिले आहे.
आशिया चषक स्पर्धेपूर्वी स्टार स्पोर्टसवर एका संयुक्त पत्रकार परिषदेत रवि शास्त्री आणि वासीम आक्रम यांनी भाग घेतला. यावेळी विराट आणि बाबर यांची तुलना करणारा एक प्रश्न आक्रम याला विचारण्यात आला. या वेळी तो म्हणाला की, या दोन खेळाडूंमध्ये तुलना होणे स्वाभाविक आहे. बाबरच्या फलंदाजीमध्ये सातत्य आहे. कारण त्याचे फलंदाजीचे तंत्र अचूक आहे. समकालीन क्रिकेटपटूंममधील महान फलंदाजांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी त्याची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे.
विराट कोहली हा बाबर आझमच्या तुलनेने खूपच पुढे आहे. सध्या माध्यम आणि चाहते हे विराट कोहलीवर टीका करत आहेत. मला असे वाटते की, विराट हा एक महान खेळाडू आहे. तो केवळ ३३ वर्षांचा आहे. मला विश्वास आहे की, विराट कोहलीचे दमदार कमबॅक होईल. तो एक शानदार खेळाडू आहे, असेही वासीम आक्रम म्हणाला. तसेच विराटचे दमदार कमबॅक होईल मात्र त्याने २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कमबॅक करु नये, अशी अपेक्षा व्यक्त करायला वासीम आक्रम या वेळी विसरला नाही.
आशिया चषक स्पर्धेला २७ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. तर ११ सप्टेंबरला या स्पर्धेतील अंतिम सामना होईल. यापूर्वी २८ ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होईल. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष वेधले आहे. या सामन्यात विराट कोहलीची खेळी भारतासाठी महत्त्व असणार आहे. सर्वांचे लक्ष या दोन क्रिकेटपटूकडे असणार आहे.
हेही वाचा :