मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी (Onion Export Ban) पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची खरमरीत टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, स्वतःच्या सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी (Onion Export Ban) हटवण्यात आल्याचा जल्लोष करून स्वतः श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यातील भाजपचे मंत्री आणि नेत्यांनी केल्याचे आता उघड झाले आहे. गाजावाजा करत जल्लोष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. (Onion Export Ban)
निर्यात बंदी (Onion Export Ban) उठवण्यात आलेली नाही. सद्य: स्थितीत केंद्र सरकारच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. स्वतःच्या पक्षाने चुकीचे निर्णय घ्यावे आणि नंतर तो निर्णय बदलून शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतल्याचा आव आणणे आता भाजपने बंद करावे. निवडणूक आणि श्रेयवादाचं राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या हिताचे सरकारने निर्णय घ्यावेत. अन्यथा जनता माफ करणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी सुनावले.
हेही वाचा :