पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या चालू मोसमात काल (ता.०९) सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा आठ गडी राखून पराभव केला. या मोसमातील गतविजेत्या सीएसकेचा हा सलग चौथा पराभव ठरला, तर हैदराबादने मोसमातील पहिला सामना जिंकला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला २० षटकांत ७ गडी गमावून १५४ धावा करता आल्या. मोईन अलीने ४८ धावा केल्या.
प्रत्युत्तरात हैदराबादने १७.४ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. SRH साठी अभिषेक शर्माने ५० चेंडूत सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. राहुल त्रिपाठी १५ चेंडूत ३९ धावा करून नाबाद राहिला. या विजयासह सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.
मात्र, या पराभवानंतर गेल्या १२ वर्षात जे घडलं नाही ते घडलं आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईला दुसऱ्यांदाच सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. यापूर्वी २०१० मध्ये चेन्नईला सलग चार पराभवाला सामोरे जावं लागलं होतं, मात्र, त्यानंतर चेन्नईने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत थेट आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले होते.
त्यावेळी संघाची कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे होते आणि सध्या रविंद्र जडेजाकडे आहे. त्यामुळे चेन्नई तसा पराक्रम पुन्हा करणार का हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
सलग चार पराभवाने जडेजाची नाराजी लपून राहिली नाही. तो म्हणाला की, आम्हाला गोलंदाजी निराशाजनक राहिली आहे, पण आणखी २० ते २५ धावा करायला हव्या होत्या. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. १५५ धावांचे लक्ष वाईट नव्हते, गोलंदाजांनी विकेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही आता कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करू.
रवींद्र जडेजाचा विक्रम
चेन्नई सुपर किंग्जसाठी कर्णधार रवींद्र जडेजाचा हा १५० वा सामना होता. चेन्नईकडून १५० सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी एमएस धोनी (२१७) आणि सुरेश रैना (२००) यांनी ही कामगिरी केली आहे.
हे ही वाचलं का ?