भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू झाला. नर्हे (ता. भोर) गावच्या हद्दीत शनिवारी (दि. 2) दुपारी चारच्या सुमारास घडली. आदित्य अशोक केदारी (वय 24) असे त्याचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील आयटी कंपनीतील अश्विनी संतोष साळी (वय 25), मोनिका अनिल सूर्यवंशी (वय 28), श्रीयश चंद्रकांत जगताप (वय 22) आणि आदित्य केदारी (सर्व रा. हरिहरेश्वर मंदिराजवळ, ससाणेवस्ती, सय्यदनगर, महमंदवाडी, पुणे) कंपनीला सलग दोन दिवस सुटी असल्यामुळे पर्यटनासाठी भाटघर धरणावर आले होते.
नर्हे गावच्या हद्दीमध्ये पोहत असताना केदारी याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या वेळी राजगड पोलिस ठाण्याचे हवालदार राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामस्थ, सरपंच दत्तात्रय गोळे, भोईराज जल आपत्ती पथकाने काही तासांत केदारी याचा मृतदेह शोधला. भोर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, आदित्यचे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. आदित्यच्या पश्चात आई, वडील आणि एक बहीण आहे.
हेही वाचा