परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिंतूर- औरंगाबाद महामार्गावरील चारठाण्यापासून १ कि.मी अंतरावर असलेल्या सिंगटाळा पाटीनजीक औरंगाबादहून जिंतूरकडे जाणार्या एसटी बसने समोरून येणाऱ्या ३ जणांना बस खाली चिरडले. यामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर २ युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार (दि.१३) सायंकाळी ७:३० च्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिंतूर आगाराची औरंगाबादहून जिंतूरकडे जात असलेली बस (MH 13 CU 6921) आणि ऐलदरी येथून सेलूकडे जात असलेली मोटारसायकल (MH 21 AJ 6256) ही दोन वाहने सिगटाळापाटी जवळ आली असता एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील शेख अमीर शेख नजीर (वय-१८), शेख मोबीन शेख नासेर (वय-२२), अतीक रफीक टामटकरी (वय-२०, रा. राजमोहल्ला सेलू जि. परभणी) हे तरूण जागीच ठार झाले. तर शेख विखार आणि शेख वसीम हे दुसऱ्या दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाले आहे.
अपघातानंतर चालकाने एसटी बस जागेवर सोडून पलायन केले. या अपघाताची माहिती चारठाणा पोलीसांना मिळाल्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोहेका गुलाब भिसे, आचार्य, जानगर आदींनी घटनास्थळीग भेट देऊन पंचनामा केला असून चारठाणा गावकऱ्यांनी यावेळी मदत कार्य केले. मयताचे शवविच्छेदन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे समजते.
हे वाचलंत का?