पारगाव; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. नद्यांकिनारी असलेल्या शेतीपंपांमधिल तांब्याचा तारा, केबल यांच्या चोऱ्या सुरुच असताना आता चंदन चोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे. वळती गावानजिक तेल्याची वात परिसरात चंदनाची झाडे कापून त्यामधिल चंदन चोरून नेण्याचा प्रकार ३१ जुलै रोजी सकाळी उघडकीस आला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात घोड, मीना नदीपात्रात शेतकऱ्यांच्या असलेल्या शेतीपंपांमधील तांब्यांच्या तारा, केबल वायरच्या चोऱ्या गेले अनेक दिवसांपासून सुरूच आहे. मागिल आठवड्यात वळती – नागापूर येथिल मीना नदीवरिल कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे जवळपास ९० ढापे चोरांनी लांपास केले होते. आता चंदन चोरांनी डोके वर काढले आहे. मागील काळात चंदन चोरांनी या परिसरात अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. परंतु त्यानंतर चंदन चोऱ्या थांबल्या होत्या. आता पुन्हा चंदन चोरांनी चोऱ्या सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
या परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर चंदनाची झाडे आहेत. तसेच घोड, मीना नदी किनारी देखील चंदनाची झाडे आहेत. चोरांनी आता ही झाडे लक्ष्य केले आहेत. वळती गावानजिक तेल्याची वात परिसरात चंदनाची झाडे कापून त्यातील चंदन काढून नेल्याचा प्रकार घडला आहे. चंदनाचा इतर भाग तेथेच टाकून चोरटे फरार झाले आहेत. वनविभागाने चंदनचोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा