उस्मानाबाद; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. आरक्षण कशाप्रकारे द्यायचे, यावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या पुढील आठवड्यात होणार्या बैठकीत चर्चा केली जाईल. समाजाला न्याय नक्की मिळेल, असा विश्वास उपसमितीचे अध्यक्ष आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे सोमवारी (दि. ३) रात्री दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, की राज्यातील जनतेला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागू नये, असे साकडे देवीला घातले. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ते म्हणाले, की नवरात्रोत्सवामुळे सर्व मंत्री आपापल्या मतदारसंघात असल्याने मंत्रिमंडळ बैठक तसेच उपसमितीची बैठकही होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. पुढील आठवड्यात मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होईल. त्यात हे आरक्षण कशा पध्दतीने द्यायचे यावर चर्चा होईल. तोपर्यंत संबंधित अधिकार्यांनाही याबाबत काम करण्यास सांगितले आहे. अधिकारीही याबाबतचा अहवाल या बैठकीत देतील.
हेही वाचलंत का ?