पुढारी ऑनलाईन डेस्क : निरोगी ह्रदयासाठी लोकांमध्ये जागृतीसह ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर प्राथमिक उपचारासंदभार्भात आराेग्य शिक्षणाचीही गरज आहे, असे मत ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी व्यक्त केले. दै. पुढारीने आयोजित केलेल्या 'आरोग्य संवाद' या व्याख्यानमालेत 'निरोगी ह्रदयाची गुरूकिल्ली' या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मधुमेह, निराेगी ह्दयाचे व्यायाम प्रकार आणि ह्रदयविकारानंतरचे व्यायाम या विषयी सविस्तर माहिती दिली.
दै. पुढारीकडून दरवर्षी आरोग्यसंवाद ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. यावर्षी २ ते ४ जुलै दरम्यान ऑनलाईन स्वरूपात ही व्याख्यानमाला आयोजन केली. 'निरोगी ह्रदयाची गुरूकिल्ली' या विषयावर आज ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
डॉ. ऋतुपर्ण शिंदे म्हणाले, "आज एखाद्या व्यक्तीला झटका येऊन चक्कर आली तर त्याला जागेवर प्राथमिक उपचार देण्यासाठी लोकांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. तसेच निरोगी ह्रदयासाठी योग्य आहार आवश्यक आहे. सध्या चमचमीत पदार्थ खायला आवडतात. पूर्वीप्रमाणे पौष्टिक आहार राहिलेला नाही. अयाेग्य आहाराचा परिणाम शरीराच्या रक्त पुरवठ्यावर हाेता आणि ह्रदयविकार बळावताे".
अलिकडे जंकफूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. असे पदार्थ खाणे टाळावे. अनेकांना कोरोनाकाळात घरी बसण्याची सवय लागली. ही सवयी सोडून देण्याची गरज आहे. नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी नमूद केले.
योग्य वेळेत आहार घेणे, रात्रीचा आहार अल्पप्रमाणात घ्यायला हवा. मधुमेह झालेल्या व्यक्तींना मांसाहार टाळावा. डॉक्टरांनी सांगितलेल्या पथ्यांचे काटेकाेर पालन करावे. तसेच नियमित औषधे घ्यावीत. यामुळे ह्रदयविकार आणि मधुमेहाच्या आजाराचा धोका कमी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
मानसिक आरोग्य चांगले ठेवावे, कुटुंबातील व्यक्तींबरोबर वेळ घालवल्यास मनावरील ताण कमी होऊ शकतो. फॅमिली डॉक्टरांशी संवाद असणे हे गरजेचे आहे, जेणेकरून प्राथमिक उपचार करत येतील, असेही ते म्हणाले. यावेळी सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.