पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेला देशभरातून झालेला विरोध आणि निषेधानंतर मोठा निर्णय घेतला आहे. एक पाऊल मागे घेत केंद्र सरकारने या योजनेत भरती होण्यासाठी लागणाऱ्या वयोमर्यादेत बदल करत ती वाढवण्यात आली आहे. योजनेमध्ये असलेली भरतीची वयोमर्यादा वय वर्षे २१ वरून २३ करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने सैन्यात भरतीसाठी 'अग्निपथ' योजना ही योजना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मंगळवारी मोठ्या दिमाखात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लाँच केली. परंतु याचे नकारात्मक पडसाद यूपी-बिहारसह देशातील अनेक राज्यांमध्ये उमटली. या योजनेविरोधी युवकांकडून देश, राज्यांमध्ये गाड्या जाळण्यात आणि दगडफेक करत हिंसक निदर्शने करण्यात आली. यानंतर केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेत वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत एकही भरती झाली नसल्याने, ही वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ष 2022 साठी अग्निपथ योजनेतून होणाऱ्या पहिल्या वर्षीच्या भरतीसाठीच ही वयोमर्यादा सवलत लागू असणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.