वाई : पुढारी वृत्तसेवा : पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसन वीर सहकारी साखर कारखान्यासाठी प्रचंड गदारोळानंतर आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन काका पाटील यांचे अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हा उपनिबंधक मोहन माळी यांनी याबाबतची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
किसनवीर सहकारी साखर कारखानासाठी ३ मे रोजी मतदान होत आहे. यासाठी दिनांक २८ मार्च रोजीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये आमदार मकरंद पाटील आणि नितीन काका पाटील यांनी पाच वर्षात केवळ दोन वेळा कारखान्याला ऊस घातल्याने त्यांचे नाव अवैध उमेदवारांच्या यादीत आले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
यावर आमदार गटाने हरकत घेत वकील यांच्यामार्फत आपले म्हणणे मांडले. आमदार गट आणि किसनवीर कारखाना व्यवस्थापनाने मांडलेली बाजू ऐकून आणि कागदपत्रांची तपासणी करून जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी मकरंद पाटील आणि नितीन काका पाटील यांचे अर्ज वैध असल्याची घोषणा मंगळवारी (दि. ५) रोजी सकाळी केली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांसह त्यांच्या समर्थक आणि अखेर सुटकेचा निश्वास सोडला.
हेही वाचलंत का?