Latest

Thane News: सिव्हिल रूग्णालय स्थलांतरित केल्याने कळवा रुग्णालय फूल

अविनाश सुतार

ठाणे: पुढारी वृत्तसेवा: ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची क्षमता संपली असल्याने रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यासाठी बेडच उपलब्ध नाहीत. मात्र, दुसरीकडे मेंटल हॉस्पिटलच्या जागेत स्थलांतरित करण्यात आलेल्या सामान्य रुग्णालयात १५० पेक्षा अधिक बेड्स रिकामे असल्याची माहिती समोर आली आहे. सामान्य रुग्णालय कोणत्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. याची जनजागृतीच पुरेशा प्रमाणात करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ उडाला आहे. परिणामी रुग्णांचा हा सर्व भार पालिकेच्या कळवा रुग्णालयावर पडला आहे. (Thane News)

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ५०० बेड्सची क्षमता असताना या ठिकाणी ६०० पेक्षा अधिक रुग्ण दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे पूर्वी अतिदक्षता विभागाची २० ची क्षमता असताना ती सुद्धा आता ४० बेड्सची करण्यात आली आहे. सामान्य रुग्णालय स्थलांतरित करण्यात आल्यानंतर या उपाययोजना यापूर्वीच करण्यात आल्या होत्या, असा दावा पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केला आहे. (Thane News)

सामान्य रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारतीचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालय मेंटलच्या जागेत हलवण्यात आले आहे. या ठिकाणी ३३६ बेड्सची क्षमता ठेवण्यात आली आहे. एवढे असूनही या रुग्णालयात १८० पेक्षा अधिक बेड्स रिकामे असून कळवा रुग्णालय मात्र रुग्णांनी ओसंडून वाहत आहे. यामागचे कारण हेच आहे की सामान्य रुग्णालय कोणत्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, याची योग्य प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली नाही. परिणामी रुग्णांचा ओढा हा कळवा हॉस्पिटलकडेच वाढला असून या रुग्णालयाची क्षमताही आता संपलेली आहे.

Thane News  : पालिकेला आले उशिराने शहाणपण …

सामान्य रुग्णालय हे मेंटल रूग्णालयाच्या जागेत स्थलांतरित करण्यात आल्याचे फलक आता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात आले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाल्याने आठवडाभरात २३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यावेळी सामान्य रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले, त्याच वेळ अशाप्रकारचे जनजागृती फलक कळवा रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात आले असते. तर कदाचित कळवा रुग्णालयाचा भार कमी होऊन झालेला अनर्थ टळता आला असता.

१५ दिवसांत घेतल्या ४०० मुलाखती…

ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात ८०० पेक्षा अधिक कर्मचारी असून भरतीची प्रक्रिया नियमितपणे सुरूच असल्याने पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. रुग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसचे अपुरे बळ असले तरी या घटना घडण्यापूर्वीच भरती प्रक्रिया राबवण्यात आली. ५ दिवसांत तब्बल डॉक्टर्स आणि नर्सच्या एकूण ४०० पेक्षा अधिक मुलाखती घेतल्या असल्याची माहिती अभिजित बांगर यांनी दिली.

सामान्य रुग्णालयात आणखी १०० बेड्स वाढवणार

मेंटल रूग्णालयाच्या जागेत स्थलांतरित करण्यात आलेल्या रुग्णालयात सध्या ३३६ बेड्स आहेत. कळवा रुग्णालयाचा भार पाहता या ठिकाणी आणखी १०० बेड्स वाढणार असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी दिली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT