ठाणे; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर पालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र या दंडाच्या रकमेत आता पाचपट वाढ करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक कचरा टाकणे, लघुशंका करणे,पाळीव प्राण्यांद्वारे अस्वच्छता या सर्वांवर पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनीही योगदान देणे आवश्यक असल्याचे आवाहन आयुक्त बांगर यांनी नागरिकांना केले आहे.
याआधी पालिकेच्यावतीने शहरात अस्वच्छतेबाबत दंड आकारण्यात आला होता, मात्र दंड लावून देखील याबाबत गांभीर्याने घेतले जात नसल्याने महानगरपालिकेने दंडाच्या रक्कमेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून वर्तणूक करणे अपेक्षित असते. शहरात आजपर्यंत जे सकारात्मक काम झाले ते शहरवासीयांच्या सहभागामुळेच झाले. मात्र जे नागरिक आपल्या कृतीमधून या उद्देशाला हरताळ फासण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध दंडनीय कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
रस्ते,मार्गावर घाण करणे,कचरा फेकणे सध्याची दंडाची 180, सुधारित दंडाची रक्कम 500 रुपये , सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सध्याची दंडाची 150, सुधारित दंडाची रक्कम 500, उघडयावर लघवी ,लघुशंका करणे सध्याची दंडाची 200, सुधारित दंडाची रक्कम 1000, उघडयावर शौच करणे सध्याची दंडाची 500, सुधारित दंडाची रक्कम 1000 व सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांद्वारे अस्वच्छता करणे सध्याची दंडाची 180, सुधारित दंडाची रक्कम 1000 असा बदल करण्यात आला आहे.