जळगाव : चेतन चौधरी
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानी सैन्याला धूळ चारणारे भारतीय लष्करातील टी-55 रणगाडे अखेर भुसावळ आयुध निर्माणीत स्थापन करण्यात आले आहेत. आयुध निर्माणीने हे रणगाडे जनतेला समर्पित केले आहेत. आयुध निर्माणीचे महाव्यवस्थापक वसंत निमजे यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण करण्यात आले. हे रणगाडे पाहण्यासाठी व सेल्फी घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत असून, त्यांचा इतिहासही जाणून घेत आहेत.
1971 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. त्यात भारतीय लष्करातील टी-55 रणगाड्यांनी पश्चिम आघाडीवर बसंतर आणि बारपीडच्या लढाईत पाकिस्तानी रणगाडे मोठ्या प्रमाणात नष्ट केले होते. त्यानंतर अनेक अत्याधुनिक रणगाडे आले व टी-55 रणगाडे सैन्यातून निवृत्त झाले. हे रणगाडे आता भुसावळ आयुध निर्माणीत स्थापन झाले असून, त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
सोव्हिएत युनियनने 1946 मध्ये केली निर्मिती
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात टी-55 रणगाडे भारताच्या पश्चिम सेक्टरमध्ये पंजाब-राजस्थान सीमेवर तैनात होते. 1946 ते 1981 या काळात सोव्हिएत युनियनने या टँकची निर्मिती केली होती. त्यानंतर 1956 ते 1989 या काळात पोलंडनेही या मॉडेल टँकची निर्मिती केली. या दोन देशांच्या धर्तीवर हे मॉडेल झेकोस्लोव्हाकियामध्ये 1957 ते 1983 दरम्यान तयार करण्यात आले होते.
टी-55 ची वैशिष्ट्ये
टी-55 हा जगातील एवढा शक्तिशाली रणगाडा होता की, त्या काळात युद्धात शत्रूचा पराभव करण्यास तो सक्षम मानला जात होता. या रणगाड्याची लांबी नऊ मीटर, रुंदी 3.7 मीटर आणि उंची 2.40 मीटर आहे. त्याचे वजन सुमारे 36 हजार किलो आहे. त्यात चार क्रू मेंबर्स बसतात. मुख्य तोफा 100 एमएमडी 10-टी झिरी आणि दुय्यम बंदूक 12.5 मिमी मशीनगन आहे. त्यात विमानविरोधी बंदूकही आहे. या टँकची 14 किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.