पुढारी ऑनलाइन डेस्क : Swachh Vayu Sarvekshan 2023 : देशात मध्य प्रदेशातील इंदूर, महाराष्ट्रातील अमरावती आणि हिमाचल प्रदेशातील परवानूची हवा सर्वात स्वच्छ आहे. 2023 च्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात लोकसंख्येच्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये या तिन्ही शहरांनी अव्वल स्थान पटकावले आहे. इंदूरने 10 लाखांच्या वर, अमरावतीने 3 ते 10 लाख तर परवानूने 3 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 मध्ये अव्वल प्रथम क्रमांक मिळवला आहे. 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या श्रेणीत दिल्ली 9 व्या आणि मुंबई 10 व्या स्थानावर आहे.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी भोपाळमध्ये निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्तच्या भोपाळ येथील कार्यक्रमात पुरस्कारांची घोषणा केली.
स्वच्छ वायू सर्वेक्षण हा पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEF&CC) राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत 131 गैर-प्राप्ती शहरांमध्ये शहर कृती आराखडा आणि हवेच्या गुणवत्तेनुसार मंजूर केलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारे शहरांची श्रेणीबद्ध करण्याचा एक उपक्रम आहे. हा उपक्रम देशात 2024 पर्यंत कण प्रदूषण 30 टक्के कमी करण्याचे लक्ष्य ठेवून आखण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये 2017 मधील वायू गुणवत्ता आणि हवा प्रदूषण याला आधार मानले आहे.
केंद्र सरकारने एकूण तीन टप्प्यात हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे, 3 ते 10 लाख लोकसंख्येची शहरे आणि 3 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे अशी विभागणी करून सर्वेक्षण करण्यात आले.
यामध्ये 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूरने देशातील सर्वात स्वच्छ हवा असलेले शहर म्हणून मान मिळवला आहे. तर 3 ते 10 लाखांच्या श्रेणीत अमरावतीने देशात अव्वल स्थान मिळवले असून 3 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हिमाचल प्रदेशमधील परवानूने प्रथम स्थान मिळवले आहे.
देशाची राजधानी दिल्लीने आर्थिक राजधानी मुंबईला या श्रेणीत एका क्रमांकाने मागे सोडले आहे. 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात दिल्ली 9 व्या स्थानावर आहे. तर मुंबई हे 10 व्या स्थानावर आहे. सर्वेक्षणानुसार, एकूण 200 गुणांपैकी दिल्लीला 177 गुण मिळाले. मुंबईचा स्कोअर 176.3 होता, तर इंदूरला सर्वाधिक 187 गुण मिळाले. दुसऱ्या श्रेणीत अमरावतीला 194 आणि तिसर्या श्रेणीत परवानूला 193.6 गूण मिळाले.
स्वच्छ वायू सर्वेक्षणात हवेची गुणवत्ता ठरवताना मुल्यांकनासाठी 8 वेगवेगळे मापदंड वापरण्यात आले आहेत. त्यामध्ये बायोमास आणि महानगरपालिका घनकचरा आणि जाळणे, रस्त्यावरील धूळ, बांधकाम आणि विध्वंस कचरा (बांधकामानंतरचा राडाराडो), वाहनांचे उत्सर्जन, उद्योगांमधून होणारे उत्सर्जन, इतर उत्सर्जन, IEC उपक्रम किंवा सार्वजनिक जागरूकता अभियान, PM 10 चे हवेतील प्रमाण (PM10 हे धूळ आणि धुरात आढळणारे अत्यंत लहान कण आहेत. त्यांचा व्यास 10 मायक्रोमीटर (0.01 मिमी) किंवा त्याहून लहान असतात), अशा आठ मापदंडांद्वारे गुण देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दरवर्षी मूल्यांकन केले जाते आणि एका वर्षाच्या कालावधीतील कामगिरीच्या मूल्यांकनावर आधारित शहरांची क्रमवारी लावली जाते.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून भोपाळ येथे 'निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त' गुरुवारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी यादव म्हणाले की, MoEF&CC भारतात 2019 पासून शहर आणि प्रादेशिक स्तरावर वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी कृतींची रूपरेषा देणारी राष्ट्रीय-स्तरीय रणनीती म्हणून NCAP राबवत आहे.
NCAP ने वायू प्रदूषण पद्धतशीरपणे कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सर्व सहभागी शहरांना यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही सुनिश्चित करून त्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवला आहे.
यावेळी यादव म्हणाले की, NCAP च्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी NCAP च्या अंतर्गतच मंत्रालयाने प्राण हे पोर्टल लाँच केले आहे. याद्वारे शहरे, राज्ये आणि लाइन मंत्रालयांच्या कृती योजना प्रतिबिंबित केल्या जातील आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या स्थितीचे परीक्षण केले जाईल. याव्यतिरिक्त, इतर शहरांद्वारे या पद्धतींचा अवलंब करण्यासाठी शहरांद्वारे स्वीकारलेल्या सर्वोत्तम पद्धती देखील पोर्टलवर सामायिक केल्या जातात, अशी माहिती भूपेंद्र यादव यांनी दिली.
हे ही वाचा :