सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : पंढरपुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. येणार्या कार्तिक वारीसाठी दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी विठ्ठलाच्या पूजेला कोणाला निमंत्रण द्यायचे यावरून मंदिर समिती प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. याबाबत मंदिर समितीची बुधवारी (दि.८) बैठक झाली. यावेळी मराठा समाजाच्या वतीने मंदिर समितीला निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना आम्ही फिरकू देणार नाही, असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या विधी व न्याय विभागानेच आता मंदिर समितीला पूजा कोणाच्या हस्ते होणार, हे कळवावे असे सांगण्यात आले आहे. Pandharpur Kartik Wari
यावेळी पंढरपुरातील मराठा समाजाच्या आंदोलकांनी मंदिर समितीला निवेदन दिले आहे. यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत भावना तीव्र आहेत. त्यासाठी येत्या १६ नोव्हेंबरला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होईल, हे अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे येणार्या कार्तिक वारीला पंढरपुरात व जिल्ह्यात कोणताही राजकीय कार्यक्रम होऊ द्यायचा नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशीला आता उपमुख्यमंत्री येण्याची आशा मावळली आहे. तर याबाबतील शासनानेच निर्णय घ्यावा, यासाठी मराठा समाजाच्या वतीने आलेले निवेदन पाठवून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिली आहे. Pandharpur Kartik Wari
तसेच यावर निर्णय होईल, तो निर्णय शासनाने कळवा, असेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे येणार्या कार्तिक वारीला नेमकी कोणाच्या हस्ते महापूजा होणार, याचा निर्णय अद्याप झाला नसल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे. त्यामुळे कार्तिक एकादशीला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार की देवेंद्र फडणवीस येणार याबाबत निर्णय झाला नसल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा