सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा अक्कलकोट- गाणगापूर रोडवर कर्नाटक हद्दीत बळुरगी गावाजवळ भरधाव कारचा टायर फुटल्याने गाडीवरील ताबा सुटून गाडी झाडावर आदळली. या अपघातात कारमधील चार महिला व चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले. आज (शुक्रवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
हा अपघात एवढा भीषण होता की, पाचही जण जागेवरच ठार झाले. या अपघाताच्या घटनेची अफझलपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अणव हिराबाई, छाया बाबासाहेब वीर यांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिली बाबासाहेब वीर, चैत्राली दिनकरा सुरवशी गंभीर जखमी झाले.
कारमधील सर्वजण दगावल्याने व दोनजण वाचलेले गंभीर जखमी असल्याने अहमदनगर वरून नातेवाईक निघाले आहेत. ते आल्यावरच रात्री उशिरा फिर्याद दाखल होईल अशी माहिती अफझलपूरचे पीएसआय विश्वनाथ मुदरेड्डी यांनी दिली. सर्व प्रवाशी अहमदनगरचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ते कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर येथे दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगरकडे जात होते.