पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निवडणुकीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जाहीर चर्चेचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी हे इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का ? असा सवाल करून ते पंतप्रधान मोदींसारख्या उंचीच्या व्यक्तीशी वाद घालू शकतात का?, अशी टीका केली आहे.
ज्या व्यक्तीच्या तथाकथित बालेकिल्ल्यात भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, त्याने बढाई मारू नये. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, त्यांनीच चर्चा करण्यासाठी पुढे यावे, असे इराणी यांनी म्हटले आहे.
केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीवर पंतप्रधान मोदींसोबत सार्वजनिक चर्चेचे निमंत्रण औपचारिकपणे स्वीकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन बी लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी निमंत्रण दिले होते.
दरम्यान, इराणी यांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस जनतेची संपत्ती मोजण्याचे बोलत आहे. नागरिकांची अर्धी संपत्ती हिसकावून घेण्याचा घाट घातला आहे. राम मंदिराबाबतचा निर्णय मागे घेण्याचे काँग्रेस बोलत आहे. हे सर्व मुद्दे केवळ पंतप्रधानांचेच नाहीत, तर राष्ट्रीय प्रश्न आहेत. प्रत्येक नागरिकाला त्यांच्यावर मत मांडण्याचा अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, खर्गे यांनी यापूर्वी इंडिया आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिले होते. आणि दावा केला होता की निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत तफावत आहे. याबाबत त्यांनी 'एक्स' वर पत्र शेअर करून निवडणूक आयोगाची विश्वासार्हता खालच्या पातळीवर घसरल्याचे सांगितले होते.
हेही वाचा