पुढार ऑनलाईन डेस्क : सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी भरीव योगदान दिले आहे. अनेक विश्वविक्रम या दोघांच्या नावावर आहेत. या दोघांच्या नेतृत्वाखाली संघाने यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली.आता या दोघांसारखाच शुभमन गिल हा खेळाडू भारताला गवसला आहे. ( Cricket Legacy) भारतीय क्रिकेट संघ ज्या खेळाडूचा शोध घेत होता तो पूर्ण झाला आहे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि यष्टीरक्षक सबा करीम यांनी व्यक्त केले आहे.
नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत शुभमन गिलने द्विशतक आणि एक शतक झळकावले. मागील काही दिवस त्याने फलंदाजीमध्ये सातत्य ठेवत नवे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या कामगिरीमुळे सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघ ज्या खेळाडूचा शोध घेत होता तो सापडला आहे, भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल हा एकमेव असा फलंदाज आहे जो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीचा वारसा पुढे नेईल, असे करीम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं.
सबा करीम म्हणाले की, शुभमन गिल याचे फलंदाजीचे तंत्र उत्कृष्ट आहे. मोठी खेळी करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. सचिन आणि कोहली यांनी घालून दिलेला वारसा शुभमन गिल पुढे नेईल. शुभमन गिल हा इंग्लंडमध्ये प्रभावी कामगिरी करु शकला नव्हता. विदेशी भूमीवर त्याची कसोटी व्हायची आहे. त्याची मोठी परीक्षा अजून व्हायची आहे; पण मागील काही दिवस तो ज्या सातत्याने फलंदाजी करत आहे, त्याच्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रतिभा असल्याचे स्पष्ट होते. भविष्यातही त्याचकडून सर्वोत्तम कामगिरी होईल, असा विश्वास वाटतो."
कठीण परिस्थितीत शुभमन गिल कशी फलंदाजी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत संघासाठी केलेले कामगिरी स्मरणीय अशीच आहे. आता गिल याला अशाच पद्धतीने धावा करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही करीम यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :