पुढारी ऑनलाईन डेस्क : कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हद्वारे सांगितले की, महायुतीमध्ये जर कोणी विघ्न आणत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. काही लोक अशा गोष्टी करत आहेत. मात्र, आम्हाला महायुती हवी आहे, असे सांगत कोणाला राजीनामा हवा असेल तर देतो, असे त्यांनी म्हटले आहे. (Shrikant Shinde )
मला वाटतं की वरिष्ठ पातळीवर ठरवतील उमेदवार कोण असेल. जो उमेदवार योग्य असेल, त्याला उमेदवारी मिळेल. पण मला या ठिकाणी एवढंच सांगायच आहे की, ही युती वेगळ्या विचारांनी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वेगळ्या विचारांनी ही युती महाराष्ट्रात केली आहे आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आहे. या सरकारच्या माध्यमातून चांगल काम होत आहे. पण मला वाटत की, कोणत्या तरी क्षुल्लक कारणावरुन त्याचबरोबर सिनिअर पीआयवर कारवाई होत नाही यासारख्या क्षुल्लक कारणावरुन हे ठराव करतात, की सेनेला सपोर्ट करायचा, तसेच कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू, यासारखी आव्हानं आपण विचारपूर्वक केली पाहिजेत, या लोकांनी आम्हाला आव्हान देण्याच काम करु नये. कारण मुख्यमंत्री शिंदेंनी दहा महिन्यापूर्वी पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जे केलं, त्याचाही विचार केला पाहिजे. जर त्यांनी हे पाऊल उचललं नसतं, तर त्याचे काय परिणाम झाले असते, याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलत असताना ते म्हणाले की," गेल्या नऊ वर्षात युतीमध्ये मी दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करत आहे. नुकतचं उल्हासनगरमध्ये ५५ कोटींचा निधी भाजप नगरसेवकांना देण्यात आला. या काही दिवसांत त्याची टेंडर होतील. हे सर्व चांगलं काम सुरु असताना शुल्लक कारणावरून कोणीही युतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नये. सर्वांनी युतीसाठी काम केल पाहिजे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी काम केल पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता काम केलं पाहिजे. मला तर कोणताच स्वार्थ नाही. जर मला सांगितलं की कल्याण लोकसभा जागेचा राजीनामा द्या तर मी उद्या राजीनामा द्यायला तयार आहे. आणि पुर्णपणे युतीच आणि पक्षाचं काम करायला तयार आहे. जर मला पक्षाने किंवा तुम्ही कोणी सांगितल की कल्याणमध्ये कोणी चांगला उमेदवार मिळत आहे कल्याण लोकसभा उमेदवारीसाठी तर तुम्ही जस त्याच्यासाठी काम करत आहात तसच मीही काम करेन त्याच्यासाठी. आमचा एकच उद्देश आहे की २०२४ मध्ये नरेंद्र मोदी देशात निवडून यावेत. असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
हेही वाचा