श्रावण आला ग वनी श्रावण आला…
दरवळे गंध मधुर ओला…
एकलीच मी उभी अंगणी…
उगीच कुणाला आणित स्मरणी…
चार दिशांनी जमल्या तोवर गगनी घनमाला…
Shravan Month : श्रावणात धो धो नसल्या तरी अल्हाददायक रिमझिम श्रावणसरी असतात त्याचबरोबर सोनेरी कोवळे ऊनही पडते सर्वत्र रंगीबेरंगी फुले बहरतात हिरव्या रंगांचे मुक्त दर्शन होते ते श्रावणातच. पृथ्वीचे हे सतेज समृद्ध स्वरूप फक्त श्रावणात पाहायला मिळते. श्रावण महिन्याला व्रतवैकल्यांचा,सणांचा राजा म्हटले जाते याच श्रावण महिन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. समस्त भाविक वर्ग या श्रावण मासाची आपली शतकानुशतकांची प्राचीन परंपरा जपत आहेत. धार्मिक विधी सण उत्सवाची लगबग महिनाभर चालणार आहे.
आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्य साधारण महत्त्व आहे प्रत्येक सण हा विशिष्ट हेतूने साजरा केला जातो त्याला धार्मिक सामाजिक आणि वैज्ञानिक असे निश्चित स्वरूपाचे अर्थ आहेत, हेतू आहेत सणांच्या निमित्ताने कुटुंबातील व्यक्तींच्या ठायी असलेला एकोपा वाढत जातो श्रावण महिन्यात धार्मिकता पूजापाठ आणि सणउत्सवी विचार चैतन्याने भरून येतात गावागावातील मंदिरात घरात धार्मिक विधी व विविध कार्यक्रमांना या श्रावण मासात उधाण येते.
अभिषेक, एकादशणी, लघुरुद्र, महारुद्र, वरदशंकर, वरदविनायक, श्री सत्यनारायण पूजा, नवचंडी शतचंडी अशी अनुष्ठाने व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावातील मंदिरात वैयक्तिक अथवा सामुदायिक स्वरूपात विविध प्रकारच्या पूजा केल्या जातात. चातुर्मासातील सर्व महिन्यात श्रावण सर्वाधिक श्रेष्ठ मानला गेलेला महिना आहे कारण या महिन्यात जवळजवळ प्रत्येक दिवस काही ना काही व्रत असतात.
विनयकी चतुर्थी, नागपंचमी, शिवामुष्टी(शिवामूठ) मंगलागौरी व्रत, जिवंतिका पूजन, (जीवत्यांची पूजा) वरदलक्ष्मी व्रत, संपत शनिवार व्रत, आदित्य राणूबाईची पूजा, वर्णषष्ठी व्रत, शीतला सप्तमी, नारळी पौर्णिमा, श्रावणी, कृष्णजन्माष्टमी व पिठोरी अमावस्या
यावर्षी श्रावण महिन्यात एकूण चार श्रावण सोमवार आले आहेत. पहिला श्रावण सोमवार 21 ऑगस्ट रोजी असून याच दिवशी नागपंचमी सुद्धा आहे. या दिवशी शिवपूजन झाल्यानंतर तांदूळ शिवामूठ म्हणून वहावे. दुसरा श्रावण सोमवार 28 ऑगस्ट रोजी असून या दिवशी महादेव शिवशंकराची पूजा झाल्यानंतर शिवामूठ म्हणून तीळ वहावे. तिसरा श्रावण सोमवार 4 सप्टेंबर रोजी असून शिवपूजन झाल्यानंतर मूग वाहावे. चौथा आणि शेवटचा श्रावण सोमवार 11 सप्टेंबर रोजी असून भगवान शंकराची पूजा झाल्यानंतर शिवामूठ म्हणून जवस शिवपिंडीवर अर्पण करायची आहे.