पुढारी ऑनलाईन, रणधीर कांबळे : विधान परिषद निकालानंतर शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत बंडाचा झेंडा फडकावला आहे. शिवसेनेच्या आमदारांसह ते थेट सुरतमधील एका हॉटेलमध्ये पोहचले. त्यांच्या या बंडाची माहिती जगजाहीर होताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. शिंदेंच्या मनधरणीसाठी पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले; पण मंगळवारी संध्याकाळचे ५ वाजून गेले तरी या बंडावर तोडगा निघाला नाही. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उरलेल्या आमदारांची बैठक घेत शिंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आणि त्यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवले.
मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेत बंडखोरीची परंपरा नवीन नाही. शिवसेना स्थापन झाल्या नंतर काही काळातच बंडू शिंगरे यांनी प्रती शिवसेना स्थापन करून पाहिलं बंड केलं होतं ; पण बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातापुढे प्रती शिवसेना उभी राहू शकली नाही.
शिवसेना ही आपल्या आक्रमक स्वभावामुळे वाढली अन् रुजली. तसे अनेक नेतेही शिवसेनेने तयार केले. त्यामध्ये छगन भुजबळ यांच्या सारखं बहुजन समाजातील नेतृत्व पुढे आलं. त्यांना शिवसेनेनं ताकदही दिली. पण आपलं कष्ट अन् कर्तृत्व अधिक असतानाही आपल्याला डावललं जात असल्याची भावना भुजबळांच्यात वाढली. पुढे मनोहर जोशी यांना विरोधीपक्ष नेते पद दिलं तेव्हा ही भावना भुजबळ यांच्या मनात वाढली आणि मंडल आयोगाला सेनेकडून विरोध होताच ओबीसीची बाजू घेत भुजबळ सेनेतून 1991 साली 18 आमदार घेऊन बाहेर पडले. आपला वेगळा गट त्यांनी विधानसभेत तयार केला. मात्र सेनेतून बाहेर पडल्यानंतर निष्ठावंत अन् कडव्या शिवसैनिकांनी भुजबळांना प्रचंड त्रास दिला. त्यांच्यावर कडव्या शिवसैनिकांनी हल्लेही केले. अगदी मंत्री असताना मिलिंद वैद्य यांनी लखोबाच्या घोषणा देत दगडफेक केली. हेच वैद्य पुढे मुंबईचे महापौर झाले तर शिवसैनिकांनी भुजबळांच्या सरकारी A10 या बंगल्यावर हल्ला केला होता. त्याचं नेतृत्व विलास अवचट यांनी केलं होत. पुढं ते एका महामंडळाचे अध्यक्ष झाले होते.
गणेश नाईक हे शिवसेनेतील तगडे नेते होते. युती सरकारमध्ये ते वनमंत्री होते. त्यांनाही बाहेर पडावं लागलं. गणेश नाईक यांना कडव्या शिवसैनिकांच्या रागाला रस्त्यावर सामना करावा लागला नाही तरी विधानसभा निवडणुकीत परभवाचा सामना करावा लागला होता.
त्यानंतर मोठं बंड केलं ते नारायण राणे यांनी. 2005 साली उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपण सेनेतून बाहेर पडत आहोत, असा आरोप करत ते बाहेर पडले. त्यांच्या सोबत 11 आमदार होते. राणे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात कोकणात खूप काळपर्यंत राडा सुरू होता. राणे समर्थकांनी मुंबईत सामनाचा अंक जाळण्यापर्यंत प्रतिउत्तर दिले होतं.
नारायण राणेंच्या बंडानंतर सेनेला सर्वात मोठा फटका बसला तो राज ठाकरे यांच्या बाहेर पडण्याने. महाबळेश्वर येथे झालेल्या सेनेच्या बैठकीत राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. सेनेत आपलं भविष्य नसल्याचं स्पष्ट होताच, 'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असा आरोप करत त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
छगन भुजबळ ते एकनाथ शिंदे अशी बंड शिवसेनेत झालीत. पण त्यावेळी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या हृदयावर राज्य होतं. त्यामुळे ते जाहीरपणे सेना-भाजप युतीच्या सरकारच्या काळात या सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हाती आहे, असं जाहीर सभेत सांगायचे. जेव्हा मनोहर जोशी यांचं प्रस्थ वाढायला लागलं तेव्हा शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करून बाळासाहेबांनी खळबळ उडवून दिली होती. तेव्हा हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले होते. एकूणच बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्याच्या जोरावर आणि शिवसैनिकांचे ते दैवत असल्यानं अनेक बंड झाली पण शिवसेनेची ताकद कायम राहिली.
आता शिवसेनेत ठाण्यातून एकनाथ शिंदे यांच्या रूपाने बंड झाल्यानं खळबळ उडाली आहे. पण ठाण्याच्या इतिहासात शिवसेनेच्या महपौराला मतदान न केल्याने सेनेचा महपौरपदाचा उमेदवार पराभूत झाला होता, त्याची शिक्षा बंड करणाऱ्या श्रीधर खोपकर यांना सेनेने दिली होती, हे सर्वश्रुत आहे. आनंद दिघे यांचं ठाण्यात एकहाती नेतृव होतं. त्यांच्याच तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे या वेळच्या बंडाचं नेतृत्व करत आहेत. हे बंड कितपत यशस्वी होणार की, सेनेच्या नेतृत्वाकडून काही अधिकचं पदरात पाडून घेत हे बंड शमवणार हे लवकरच स्पष्ट होईल.