जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जेजुरी (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (दि. 13) 'शासन आपल्या दारी'हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, काही अपरिहार्य कारणामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुधारित तारीख लवकरच देण्यात येईल, असे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
जेजुरीत गुरुवारी 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासोबतच जेजुरी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री उपस्थित राहणार होते. गेल्या 8 दिवसांपासून याबाबतचे नियोजन सुरू आहे. या कार्यक्रमात आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा, बचत गटांचे स्टॉल, तसेच शासकीय योजनांचे प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. या वेळी 50 ते 60 हजार लाभार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित राहणार आहेत. त्यानुसार शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
या कार्यक्रमासाठी येथील पालखी मैदानावर साडेआठ एकर जागेत 1 लाख 57 हजार स्क्वेवर फूट क्षेत्रफळाचा मंडप उभारण्यात आला आहे. दरम्यान, पुणे-बारामती रस्त्यावर जड, अवजड व इतर वाहतूक, तसेच बाजारदेखील बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दुसरीकडे सुमारे 600 एसटी बस व इतर वाहनांसाठी तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.
याशिवाय, जेजुरी-मोरगाव रस्त्यानजीक हेलिपॅड बनविण्याचे कामदेखील पूर्ण झाले होते. मात्र, ऐनवेळी काही अपरिहार्य कारणांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे पालखी मैदानात उभारलेला मंडप, तसेच राबविण्यात आलेली शासकीय यंत्रणा यांच्या खर्चाला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जेजुरीच्या पालखी मैदानावर व्यासपीठासमोर कार्यक्रमासाठी लोखंडी पिलर उभारून मंडपाचे काम सुरू होते. बुधवारी (दि. 12) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या शेडचा काही लोखंडी भाग कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी युद्ध पातळीवर शेडचे काम पूर्ण करण्यात आले.
हेही वाचा