पुढारी ऑनलाईन डेस्क : जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीमार झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. दरम्यान, इंडिया बैठकीवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी लाठीचार्जचे आदेश देण्यात आले. मराठा समाजाचे आंदोलन चिघळण्यासाठी मंत्रालयातून अदृश्य फोन आल्याचा दावा देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले, जालन्यातील आंदोलन चिघळण्यामागे सरकारचा हात आहे. मराठा समाजाचं आंदोलन शांततेने सुरू होतं. आंदोलन चिघळण्यासाठी मंत्रालयातून अदृश्य फोन आला आणि सरकारच्या आदेशावरून हा लाठीमार झाल्याचे ते म्हणाले. आजपर्यंत अनेक मोर्चे आंदोलने शांततेच्या मार्गाने झालेत, आत्तापर्यंत अशी घटना राज्यात कधीच झाली नाही. मग महाराष्ट्रात ही वेळ का आली? असा प्रश्न देखील खासदार राऊत यांनी उपस्थित (Sanjay Raut) केला आहे.
आम्ही उद्धव ठाकरेंसह येथील मराठा आंदोलकांची भेट घेतली. पोलिसांना बाहेर ठेवून आम्ही जालन्यात गेलो. आंदोलक पोलिसांना गावात येऊ देत नाहीत. लाठीचार्जचा आदेश देण्यामागे कोणाचा हात? हे शोधून काढणे गरजेचे आहे. महाष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळावा ही शिवसेनेचीही भूमिका आहे. आम्ही सर्व पक्ष यासाठी सरकारला सहकार्य करू, सरकारने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.
संसदेचे विशेष सत्र पीएम मोदींनी बोलावले आहे. हे सत्र १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधित होणार आहे. यावेळी चीनची लडाखमधील घुसखोरी, मणिपूर या विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.