पुढारी ऑनलाईन: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअॅप मेसेजवरून आज (दि.०९ जून) सकाळी जीवे मारण्याची धमकी मिळाली. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांचे भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या फोनवर संजय राऊत यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
याविषयी माध्यमांशी बोलताना राऊत यांचे भाऊ सुनील राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मला काल माझ्या फोनवर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी देणारी व्यक्ती हिंदीमधून बोलत होती. त्यांनी मीडियाशी बोलू नका, असे देखील धमकावले होते. या संदर्भातील माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे, अशी माहिती सुनील राऊत यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
खासदार संजय राऊत यांनी आज (दि.०९) माध्यमांशी बोलताना कोल्हापुरातील हिंसाचाराला राज्य सरकारच जबाबदार आहे. या घटनेला राज्याचे गृह खाते आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा आरोप केला आहे. ते पुढे म्हणाले, आज तब्बल ४०० वर्षानंतरही औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात हिंसक घटना घडत आहेत. राजकीय फायद्यासाठी औरंगजेबाला पुन्हा जिवंत केले जात आहे, असे मत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. मात्र, संजय राऊत यांनी जीवे मारण्याच्या धमकी बाबत काहीही सांगितले नाही.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना व्हॉट्सअॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून आज (दि.०९जून) सकाळी जीवे मारण्याची धमकी मिळाली. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. दरम्यान माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. राजकारणात मतभेद असतात पण हा द्वेष दुर्दैवी आहे. यातून काही बरं वाईट झाल्यास याला केंद्र आणि राज्याचे गृहखाते जबाबदार राहील, असा इशारा देखील सुळे यांनी दिला. तसेच त्यांनी पुढे महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांमध्ये (Sanjay Raut) जातीने लक्ष घालावे अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली.