पुढारी ऑनलाईन डेस्क
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौर्यावर ( India vs South Africa ) जाण्याच्या तयारीत असताना क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा आहे ती विराट कोहली आणि रोहित शर्मामधील वादाची. विराट आणि रोहित हे एकमेकांना टाळत असल्याचे चित्र आहे. दुखापतग्रस्त असल्याचे सांगत सोमवारी ( दि. १३ ) रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिका दौर्यातील कसोटी माकिलेतून बाहेर पडला. तर मंगळवारी ( दि. १५) या दौर्यातील वनडे माकिलेत विराट खेळणार नाही, अशी चर्चा सूरु झाली. विराट आणि रोहित दोघेही एकमेकांना टाळत आहेत. या घडामोडींवर १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेतील क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
किर्ती आझाद यांनी म्हटलं आहे की, विराट आणि रोहित हे दोघेही भारतीय क्रिकेट संघात नसतील तर याचा फटका संघाला बसणार आहे. मात्र तत्पूर्वी या दोन्ही खेळाडूंचेही मोठे नुकसान होणार आहे. कारण दुसरे खेळाडू त्यांची जागा घेवू शकतात. भारतीय क्रिकेट संघात कोणत्याही खेळाडूंचे स्थान पक्के नसते. भारतीय क्रिकेट संघात सुनील गावस्कर, कपिलदेव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली असे अनेक दिग्गज खेळाडू होते. यानंतही अनेक उत्कृष्ट खेळाडू आले. आता दोघेही एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळले नाहीतर यामध्ये दोघांचेही मोठे नुकसान होणार आहे. कारण त्यांची जागा घेण्याची क्षमता असणारे प्रतिभावंत खेळाडू आज देशात आहेत, असेही किर्ती आझाद यांनी स्पष्ट केले आहे.
रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेसाठी फिट नाही. तर वनडे मालिकेमध्ये विराट कोहली खेळणार नाही. दोन्ही मालिकांमध्ये भारताचे सर्वोत्कृष्ट खेळाडू बाहेर असतील तर निश्चित याचा परिणाम भारतीय संघावर होणार आहेत. विराट आणि रोहित हे भारतीय फलंदाजीचा कणा आहेत. आता दोघांमध्ये काही मतभेद असतील तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यामध्ये दखल देणे आवश्यक आहे. दोघांमधील मतभेद हे भारतीय क्रिकेट संघातील अन्य खेळाडूच्या मनस्थितीवर परिणाम करणारे ठरु शकतात. दक्षिण आफ्रिकेमधील खेळपट्टी ही अन्य देशांपेक्षा वेगळी आहे. येथे वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करतात, असेही आझाद यांनी स्पष्ट केले.
हेही वाचलं का?