पुणे, पुढारी ऑनलाईन : निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे पुण्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. निर्भिड प्रशासकीय अधिकारी आणि प्रख्यात लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. माधव गोडबोले हे सन १९५९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. केंद्र सरकारचे गृहसचिव असताना १९९३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती.
डाॅ. गोडबोले यांनी निवृत्ती घेतल्यानंतरही जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती आदी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. भारतीय राजकारणाला कलाटणी देणाऱ्या बाबरी मशिदी पाडण्याची घटना होत असताना ते केंद्रीय गृहसचिव होते.
डॉ. माधव गोडबोले यांनी प्रशासनासह अनेक पुस्तकेही लिहिली होती. माधव गोडबोले यांनी २२ पुस्तके लिहिली. त्यातील अनेक पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत. त्यातील काही पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाला आहे. 'अपुरा डाव' या नावाचे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित झाले आहे. माधव गोडबोले यांच्या मराठीतील पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.
हे वाचलंत का?