Latest

‘लवकरात लवकर तोडगा काढा’; राज्यपाल कोश्यारी विरोधात उदयनराजे भोसलेंचे पंतप्रधानांना पत्र

backup backup

नवी दिल्ली, ९ डिसेंबर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशाची अस्मिता आहे. शिवरायांबद्दल त्यामुळे प्रत्येकाने विचारपूर्वक विधान करावे. सध्या राज्यपाल पदावर भगतसिंग कोश्यारी आहेत. देशात जसे राष्ट्रपती हे पद मोठे असते. तसेच, राज्यात राज्यापाल हे पद फार मोठे असते.या पदावर असताना त्यांनी शिवरायांबद्दल असे विधान करणे अपमानास्पद आहे.त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे,असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांसोबत झालेल्या या बैठकीत भाजपचे खासदार उपस्थित होते.

या बैठकीनंतर खासदार उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांमधील राज्यसभेच्या भाजपाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण तीन राज्यांमधील २६ खासदार सहभागी झाले होते. उर्वरित खासदारांची कालांतराने बैठक होणार आहे, अशी माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली.
२३ नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत आहे, याबाबत पत्र लिहिले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतर त्यांनी ते पत्र गृहमंत्रालयाकडे  पाठवले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे आज यासंदर्भात पत्र पाठवले. या पत्रात कोणत्याही राज्यात घडणारा एखादा प्रकार इतका वाढू नये की, ज्यामुळे तेढ निर्माण होईल, अशी मागणी केल्याचे उदयनराजे म्हणाले. राज्यात सध्या तेढ निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. ही थांबून पुन्हा पुर्वरत सर्व शांततापूर्ण वातावरण निर्माण व्हावे, अशी पंतप्रधान मोदींकडे मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच या मागणीनंतर पंतप्रधानांच्या प्रक्रियेनुसार कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अपमान पाहता काही शिवभक्त एकत्र येत आहेत. मविआच्या आंदोलनाकडे राजकीय दृष्टीकोनातून बघणे चुकीचे आहे. हा विषय कोणत्या एका पक्षाचा नाही. पंरतु, सातत्याने शिवरायांचा होत असलेल्या अपमानामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील शिवभक्त नाराज आहेत. शिवरायांचा वारंवार होणाऱ्या अपमानावरून हे महाराष्ट्रात चालते असे वाटायला नको. त्यामुळे याला कुठेतरी रोखले पाहिजे. याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT