पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. अनेक महिन्यांपासून जखमी असल्यामुळे संघाबाहेर असलेला जडेजा पुनरागमन करणार आहे. जडेजाने यासाठी घेण्यात येणारी यो-यो टेस्ट पास केली आहे. (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो भारतीय संघाचा भाग असेल. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीला नागपूरच्या मैदानावर खेळवला जाईल. राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने बुधवारी (दि.१) रवींद्र जडेजाच्या फिटनेसबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामध्ये जडेजाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रवींद्र जडेजाने नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून सामना खेळला होता. तामिळनाडू विरूद्ध खेळताना रवींद्र जडेजाने ४२ षटक टाकत ७ विकेट्स पटकावल्या होत्या. दरम्यान, जडेजाने राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीकडून घेण्यात येणारी फिटनेस टेस्टही पास केली आहे. अशातच जडेजा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रवींद्र जडेजाने भारतीय संघासाठी शेवटचा सामना २०२२ च्या आशिया चषकात खेळला होता. आशिया चषकादरम्यान, गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे ५ महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागले. यानंतर जडेजाला २०२२ मध्ये खेळवण्यात आलेल्या टी२० विश्वचषकालाही मुकावे लागले होते. (Ravindra Jadeja)