Latest

Ranil Wickremesinghe : पाठीशी केवळ एक खासदार असूनही विक्रमसिंघे श्रीलंकेचे पंतप्रधान

अमृता चौगुले

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : आर्थिक आणि राजकीय अस्थैर्याचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत अखेर युनिटी गव्हर्न्मेंटच्या पंतप्रधानांची निवड करण्यात आली आहे. केवळ एक खासदार असलेल्या युनायटेड नॅशनल पक्षाचे नेते रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांची पाचव्यांदा पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांनी विक्रमसिंघे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

73 वर्षीय रानिल (Ranil Wickremesinghe) यांची ओळख उत्तम राजकीय प्रशासक अशी असून, ते अमेरिकेचे समर्थक मानले जातात. रानिल विक्रमसिंघे यांनी यापूर्वीही श्रीलंकेचे पंतप्रधानपद सांभाळले आहे. 2020 मध्ये महिंदा राजपक्षे पंतप्रधान होण्याआधी रानिल हेच श्रीलंकेचे पंतप्रधान होते. 2019 मध्ये पक्षाच्या दबावामुळे त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

रानिल विक्रमसिंघे यांच्याविषयी…

  • रानिल विक्रमसिंघे हे 1994 पासून युनायटेड नॅशनल पक्षाचे प्रमुख
  • आतापर्यंत चारवेळा श्रीलंकेचे पंतप्रधानपद भूषविले
  • 1977 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून विजयी
  • 1993 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली
  • आतापर्यंत उपपरराष्ट्र मंत्री, युवा आणि रोजगार मंत्री यांसह इतर मंत्रिपदे भूषवली

दरम्यान, श्रीलंकेतील ट्रेड युनियन्सनी सरकारविरोधातील संप मागे घेतला आहे. देशातील हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. काही लोक या संकटाचा फायदा घेऊ इच्छितात; पण आम्ही ती संधी देणार नाही. देशात स्थैर्य राखणे आमची जबाबदारी आहे, असे युनियनने म्हटले आहे.

महिंदा राजपक्षेंचा पासपोर्ट जप्‍त 

दरम्यान, माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या जवळच्या आठ सहकार्‍यांना न्यायालयाने देश सोडण्यास बंदी घातली आहे. या सर्वांचे पासपोर्ट जप्त केले जात असल्याची माहिती आहे. महिंदा हे राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांचे बंधू आहेत. सध्या महिंदा हे नौदलाच्या एका तळावर लपून बसले आहेत.

..तर मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर सुद्धा राजीनामा देणार

श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर पी. नंदलाल वीरसिंघे यांनी आगामी दोन आठवड्यांत श्रीलंकेतील राजकीय अस्थैर्य संपुष्टात आले नाही तर पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. राजकीय संकट सोडवले नाही तर देशावरील आर्थिक संकटाचा सामना करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतात, असे ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT