पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एम्समधील उपचारांच्या १५ व्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि. २५) सकाळी ते शुद्धीवर आले. राजू एम्सच्या वैद्यकीय कर्मचार्यांशी हातवारे करत बोलताना दिसले. नर्सला हातवारे करून विचारले, त्याने मी हॉस्पिटलमध्ये कसा काय ॲडमिट झालोय? अशी विचारणा केली. त्यानंतर नर्सने तुम्हाला चक्कर आल्याने तुम्ही पडला होता, आणि त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
राजूचे मेहुणे आशिष श्रीवास्तव यांनी माहिती देताना राजू बाबत शुद्धीवर आल्याचे सांगितले. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने राजू यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून राजू यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टर, कुटुंबीय, मित्र आणि चाहते सर्वजण राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. अखेर आज (दि. २४) राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले आणि यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव सकाळी 8.10 वाजता शुद्धीवर आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती तपासली. एकीकडे राजू श्रीवास्तव शुद्धीवर येताच त्यांचा मित्र सुनील पालच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली. सुनील पाल यांनी राजू श्रीवास्तव यांच्या आरोग्याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच ट्विटरवरून प्रतिक्रिया प्रतिक्रिया देत 'चमत्कार झाला' अशी भावना व्यक्त केली आहे.
व्हिडिओमध्ये सुनील पाल म्हणतात की, 'गुड न्यूज.. गुड न्यूज मित्रांनो… राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले आहेत. मी म्हणायचो की चमत्कार घडेल. जो हसतो त्याच्यावर देव रागावू शकत नाही. सर्व कुटुंब, मित्र आणि प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाला प्रेम, धन्यवाद. राजू भाई तुम्ही हजारो वर्षे जगा, हीच इश्वर चरणी प्रार्थना आहे.' सुनील पाल यांनी राजू श्रीवास्तव यांचे हेल्थ अपडेट देऊन त्यांच्या चाहत्यांना खूश केले.