जळगाव : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असून त्यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. आज गुरुवारी (दि.20) साडेपाचच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, पावसाच्या हजेरीमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील काही भागात दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. गुरुवारी (दि.20) दुपारी 5 नंतर जळगाव, यावल, भुसावळ शहरासह परिसरात जोरदार वारा सुटला. यानंतर पावसाने दिलासादायक हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर पावसामुळे मात्र नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
तापमानात घट…
जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला होता. मागील दोन दिवसापूर्वी ४३.९ अंश तापमान नोंदविल्या गेलेल्या भुसावळात तरी आज ४१.६ अंश इतके तापमान नोंदविले गेले. जळगावातही पारा ४१ अंशावर होता. गेल्या सहा दिवसांत भुसावळ शहराचे तापमान वाढले होते. मात्र आज ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरल्याने दिलासा मिळाला.