Latest

धक्कादायक ! पहिल्याच दिवशी फी साठी विद्यार्थ्यांना हाकलले शाळेबाहेर

अमृता चौगुले

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : चालू वर्षाची शैक्षणिक फी न भरल्यामुळे राजगुरुनगर मधील एका नामांकित शाळेने पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर हाकलत त्यांचे अजब असे स्वागत केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच मनसेचे सोपान डुंबरे, नितीन ताठे यांनी आक्रमक पवित्रा घेत शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर जवळपास एक तासाने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.टी ई एस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुरूवारी (दि १५) घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे पालक वर्गाबरोबरच शहरातील नागरिक, विवीध संघटना आक्रमक झाल्या आहेत. शाळेच्या या कारवाईचा निषेध करत शिक्षण विभागाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. इयत्ता आठवी ते दहावी च्या वर्गातील हे विदयार्थी आहेत. चालू वर्षाची शैक्षणिक फी या विद्यार्थ्यानी भरली नव्हती.

पहिला दिवस म्हणून उत्साह आणि आनंदाने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात आल्याने विदयार्थी, पालक मनस्वी दुखावले. शाळेचा पहिला दिवस म्हणुन सर्व शाळा विद्यार्थ्यांचे वाजत गाजत आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतात. मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांचचे असे स्वागत झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वर्गाबाहेर काढलेल्या विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांना पालक येईपर्यंत शाळेच्या व्हरांड्यात उघडयावर बसावे लागणे ही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणामकारक घटना असल्याच्या प्रतिक्रीया पालकांनी नोंदविल्या आहेत.

मागील तसेच चालू शैक्षणीक वर्षाची फी द्यावी म्हणून पालकांना वारंवार आवाहन करण्यात आले. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने निवडक पालकांना महिती द्यावी असे विद्यार्थ्याना सांगितले. विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर थांबवले होते. असे शालेय समितीकडून सांगण्यात आले. मात्र थेट महिती द्यायला कोणीही समोर आले नाही.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT