धुळे पुढारी वृत्तसेवा ; साक्री शहरात धुलिवंदनाच्या दिवशी झालेल्या दंगलीचे पडसाद राज्याच्या अधिवेशनात उमटले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. पण या राज्यात प्रभू श्रीरामाचंद्रांचे गीत ऐकणे अपराध होत असेल तर वाईट आहे. या दंगल प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात धुलिवंदनाच्या दिवशी दोन गटात वाद झाला. यानंतर हाणामारी दगडफेक झाली. या नंतर सोशल मीडियाच्या एका मेसेज वरून साक्री शहरात बंद पाळण्यात आला. या मेसेज व्हायरल प्रकरणात वेगळा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पण आता साक्री शहरात झालेल्या या तणावाचे पडसाद राज्याच्या अधिवेशनात उमटले आहेत. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी अधिवेशनात माहिती देताना सांगितले की, धुळे जिल्ह्यातील साक्री येथे काही परिवार धुलिवंदनाच्या दिवशी डीजेवर आनंद साजरा करत होते. यावेळी एका गटाच्या प्रार्थनेची वेळ झाल्याने त्यांनी डीजे बंद करण्याची विनंती केली. त्यानुसार डीजे बंद देखील करण्यात आला. मात्र यानंतर प्रभू श्री रामचंद्रांचे गाणे सुरू असताना अचानक एका गटाकडून दगडफेक करण्यात आली. यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र हल्लेखोर गटाकडून तलवार, गुप्ती, आणि कोयते यांचा वापर झाला. धुळे जिल्हा पोलिसांनी दोन्ही गटांकडून तक्रारी घेतल्या. मात्र मारहाण करणार्यांना तात्काळ सोडले. तर ज्यांना मारहाण झाली, त्यांना रात्रभर बसवून ठेवले या गटाला दुसऱ्या दिवशी जामीन झाला.
मात्र या दरम्यान खरे हल्लेखोर मात्र फरार झाले आहेत असा आरोप त्यांनी विधानसभेत केला. या राज्यात प्रत्येक धर्माचा आदर केलाच पाहिजे. पण प्रभु रामचंद्रांचे गीत ऐकणे अपराध होत असेल तर ही वाईट बाब आहे. या प्रकरणात कठोर कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.