पुढारी ऑनलाईन : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सध्या दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात तिहार तुरूंगात आहेत. या घोटाळ्यातील मनी लॉड्रिंग प्रकरणी सिसोदिया यांची सीबीआय आणि ईडी चौकशी सुरू आहे. दरम्यान, सिसोदिया यांनी तुरुंगातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून देशवासियांना पत्र लिहले आहे. या पत्रात सिसोदिया यांनी पंतप्रधान कमी शिकलेले असणे देशासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे म्हणत, पीएम मोदींच्या शिक्षण आणि सुशिक्षितपणावर प्रश्न उपस्थित केला आहे.
पुढे सिसोदिया यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पीएम मोदींना विज्ञानवादी गोष्टी समजत नाहीत. ते शिक्षणाचे महत्त्व समजू शकत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी ६० हजार शाळा बंद केल्या आहेत. त्यामुळे भारताची प्रगती आणि समृद्धीसाठी सुशितक्षित पंतप्रधान असणे, अत्यंत आवश्यक आहे, असे मनीष सिसोदिया यांनी देशाला उद्देशून लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्ली मद्य घोटाळा मनीलाँड्रिंग प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात त्याची न्यायालयीन कोठडी बुधवारी (दि.०५) संपली. यानंतर त्यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करतेवेळी दिल्ली कोर्टाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ एप्रिलपर्यंत वाढ केली. त्यांच्या जामीन अर्जावर आता १२ एप्रिलला नियमित सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे.