पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांना भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२) फेटाळून लावली. सरन्यायाधीश यू. यू. ललित आणि न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. वकील मुरसलीन असिजित शेख यांनी ही याचिका दाखल केली होती.
(Dhananjaya Chandrachud) आम्हाला या याचिकेवर विचार करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. संपूर्ण याचिका पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायाधीशांनी दिलेले न्यायालयीन आदेश त्यांच्या नियुक्तीला आव्हान देण्याचे कारण असू शकत नाहीत. तुम्ही येथे वाद घालू शकत नाही किंवा असे मुद्दे मांडू शकत नाही, असे न्यायमूर्ती भट यांनी सांगितले.
वकील मुरसलीन असिजित शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाची जाणीवपूर्वक अवहेलना केली. आणि पात्र याचिकाकर्त्यांना न्याय नाकारला, असा आरोप केला आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी त्यांच्या मुलाच्या निकटवर्तीयाशी संबंधित खटला चालविला होता. राज्य सरकारसह प्रतिवादींना नोटीस न बजावता एकतर्फी आदेश दिला होता, असा आरोपही याचिकेत करण्यात आला होता. तसेच न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान आणि अन्य फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसह याचिकेत त्यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यापासून परावृत्त करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याचीही विनंती करण्यात आली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?