पुढारी ऑनलाईन: कालपर्यंत स्वत:ला कट्टर शिवसैनिक समजणारे, शिवसेनेसाठी रडणारे आज अचानक शिंदे गटात सामील होतात, हे आश्चर्यकारक आहे. थांबणाऱ्याला कारण हवं असतं, तर जाणाऱ्यांना फक्त एखादा बहाणा हवा असतो, अशी टिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यावर केली.
माध्यमांशी बाेलताना संजय राऊत म्हणाले की, विधिमंडळात घेण्यात आलेल्या बहुमत चाचणी दरम्यान कालपर्यंत शिवसेनेत असलेले संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर मतदारसंघात जाऊन जनतेला काय तोंड दाखवणार, असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी काम करावं. यापूर्वी देखील भूजबळ, राणेंनी देखील अशीच भडक भाषणे केली आहेत; पण त्याच्या शिवसैनिकावर काहीच परिणाम झाला नाही.
उद्धव ठाकरे हे दुधखुळे नाहीत, ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात, असे सांगत साेमवारी विधिमंडळात एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. हिम्मत असेल तर निवडणूका घ्या आम्ही तयार आहोत. यामध्ये शिवसेना १०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.