Latest

Rawalpindi Pitch : रावळपिंडीच्या खेळपट्टीवरून ICC भडकले, पाकिस्तानची काढली खरडपट्टी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडकडून सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका दिला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ज्या रावळपिंडी मैदानावर खेळवण्यात आला होता त्या मैदानातील खेळपट्टीवरून क्रिकेटची सर्वोच्च संस्था भडकली असून ही खेळपट्टी सरासरीपेक्षा कमी असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. (pakistan vs england rawalpindi pitch receives below average by icc)

रावळपिंडी कसोटी सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड फलंदाजांनी धावांचे डोंगर रचले. या सामन्यात एकूण 1700 हून अधिक धावा स्कोअरबोर्डरवर झळकल्या. हा सामना अनिर्णित राहिल की काय असे वाटत असताना इंग्लंडच्या रणनीतीमुळे सामन्याचा निकाल लागला. बेन स्टोक्सच्या इंग्लिश संघाने हा सामन्यात 74 धावांनी विजय मिळवला. सामन्याचा निकाल लागला असला तरी रावळपिंडीच्या खेळपट्टीबाबत क्रिकेट जगतातून जोरदार टीका झाली. याची दखल आयसीसीनेही घेतली आणि रावळपिंडीच्या खेळपट्टीबाबत आपला निकाल दिला. (pakistan vs england rawalpindi pitch receives below average by icc)

ट्विटरवरून पोस्ट शेअर करत आयसीसीने रावळपिंडीच्या खेळपट्टीबद्दल आपले मत जाहीर केले आहे. रावळपिंडीची खेळपट्टी सरासरीपेक्षा कमी असल्याची टीप्पणी क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेने केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनीही रावळपिंडीच्या खेळपट्टीला लज्जास्पद म्हणून जोरदार टीका केली होती. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतरही रावळपिंडीच्या खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी असल्याचा निर्णय देण्यात आला होता. (pakistan vs england rawalpindi pitch receives below average by icc)


एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीचे अँडी पायक्रॉफ्ट यांनी रावळपिंडीच्या खेळपट्टीबाबत निष्कर्ष प्रसिद्ध केला. पायक्रॉफ्ट यांनी रिपोर्टमध्ये म्हटलंय की, 'रावळपिंडीची खेळपट्टी अतिशय सुमार दर्जाची आणि सपाट होती. जी कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजाला उपयुक्त ठरली नाही. त्यामुळे दोन्ही संघांच्या फलंदाजांनी त्यावर वेगवान धावा केल्या. परिणामी आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मी ही खेळपट्टी सरासरीपेक्षा कमी मानतो, अशी टीप्पणी त्यांनी केली आहे. रावळपिंडीची खेळपट्टी सलग दोनदा सरासरीपेक्षा कमी घोषित करण्यात आली आहे आणि जर असे पुन्हा घडले तर त्यावर सुमारे एक वर्षासाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यास बंदी घातली जाऊ शकते.

SCROLL FOR NEXT