पुढारी ऑनलाईन डेस्क : म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटीचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आज (दि.१२) रविवारी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Padalkar VS Jitendra Awhad) यांनी परीक्षा रद्द झाल्याचे ट्विट करून सांगितले.
परीक्षा जानेवारीत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पेपर फुटीवर जोरदार टीका केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुलांच्या भवितव्याशी खेळ करून त्यांची थट्टा केल्याची टीका पडळकर यांनी केली आहे.
पडळकर म्हणाले कि, प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा दर आठवडायाला एक्सेल शीटमध्ये न चुकता हिशोब घेतात. पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही. ते स्वतःच मागील आठवड्याभरापासून म्हाडाचे नोकर भरती परिक्षामध्ये घोटाळे होणार आहेत, त्यात बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यातून आवाहन करत होते.
जर त्यांना घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली. यावरून सिद्ध होते की प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस आहे. एक एक पै गोळा करून परिक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी त्यांना काहीही देणेघेणे नाहीये. अशी जोरदार टीका आमदार पडळकर यांनी केली.
आरोग्य भरतीमधील पेपरफुटीवरून राज्यात वादंग माजले असतानाच आता म्हाडामधील नोकर भरतीसाठी होणारी परीक्षा मध्यरात्री रद्द झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील विद्यार्थी परीक्षेसाठी पोहोचले असतानाच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द झाल्याचे ट्विट करून सांगितले आहे. आता ही परीक्षा जानेवारीत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. परत एकदा क्षमा मागतो.
तत्पूर्वी, नोकरी लावून देण्यासाठी पैसे घेणार्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी म्हाडाच्या भरती परीक्षा ही पूर्व परीक्षा गृहीत धरण्यात येणार असून त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केली होती.