पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्ही देशातील १४० कोटी लोकांसाठी लढू, संसद आणि संसदीय प्रतिष्ठेसाठी लढू, संविधानासाठी लढू, असे काँग्रेसचे नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी म्हटले आहे. ते दिल्लीतील जंतरमंतरवर आयोजित आंदोलनादरम्यान बोलत होते. संसदेतील निलंबित खासदार आणि सरकारच्या धोरणाविरूद्ध विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीकडून जतंरमंतरवर आंदोलन आणि निदर्शने सुरू आहे. यावेळी अनेक नेत्यांनी आपले मत मांडले. (Opposition MPs at Jantar Mantar)
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान १४६ सदस्यांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या प्रमुखांकडून शुक्रवारपासून (दि.२२) देशव्यापी निदर्शने करण्यात येत आहेत. दिल्लीतील जंतरमंतर येथे या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. विरोधकांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन 'लोकशाही वाचवण्यासाठी' करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हेही आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. (Opposition MPs at Jantar Mantar)
आतापर्यंत एवढ्या खासदारांना कधी निलंबित करण्यात आले आहे का? आम्ही फक्त गृहमंत्र्यांकडे निवेदनाची मागणी केली होती, असे मत काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे.
"सध्या सत्तेत असलेल्यांपासून आपल्याला लोकशाही वाचवायची आहे. संसदेत सुरक्षा भंगाच्या घटनेसाठी भाजपला जबाबदार धरले पाहिजे," असे मत सीपीआय (एम) नेते सीताराम येचुरी दिल्लीच्या जंतरमंतरवर विरोधी पक्षांच्या आंदोलनादरम्यान व्यक्त केले.