नवी दिल्ली, मणिपूरमधील हिंसाचार आणि महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उभय सदनात (Parliament Monsoon Session) निवेदन करावे, हा विरोधी पक्षांचा आग्रह कायम आहे. संसदेचे आज, सोमवारचे कामकाज या विषयावरुन झालेल्या गदारोळात वाहून गेले. 'इंडिया फाॅर मणिपूर', 'इंडिया डिमांड पीएम स्टेटमेंट आॅन मणिपूर' अशा आशयाचे फलक दाखवित काॅंग्रेससह अन्य विरोधी सदस्यांनी लोकसभेत जोरदार राडेबाजी केली.
मणिपूरच्या विषयावर संसदेत (Parliament Monsoon Session) चर्चा व्हावी आणि त्यायोगे सत्य जनतेसमोर यावे, अशी सरकारची इच्छा आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी दुपारच्या सत्रात लोकसभेत सांगितले. तथापि त्यानंतरही गोंधळ न थांबल्याने अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. तत्पूर्वी सकाळी कामकाजाला सुरुवात झाल्या झाल्या काँग्रेसचे नेते अधिर रंजन चैधरी यांनी मणिपूरच्या मुद्यावर पंतप्रधानांनी निवेदन करावे, अशी मागणी केली. अध्यक्ष बिर्ला यांनी ही मागणी फेटाळून लावली. 'चर्चेला उत्तर कोण देणार, हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाहीत. तुम्ही नवीन परंपरा चालू करु नका', असे बिर्ला यांनी विरोधकांना सुनावले.एकीकडे संसदेत राडेबाजी सुरु असताना दुसरीकडे संसदेबाहेर विरोधक मणिपूरच्या विषयावर आक्रमक झाले होते. काॅंग्रेसचे नेते मलि्लकार्जुन खर्गे, संयुक्त जनता दलाचे राजीव रंजन सिंग, द्रमुकचे टी. आर. बालू, आम आदमी पक्षाचे संजय सिंग, राजदचे मनोज झा व अन्य विरोधी नेत्यांनी संसद प्रांगणात निदर्शने केली. दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी बंगाल, राजस्थानमधील महिला अत्याचाराच्या मुद्यावरुन निदर्शने केली.