Latest

सांगली : आमदार शिरसाट यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे ‘नो कॉमेंट्स’

दिनेश चोरगे

विटा; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुर, सांगली येथील अतिवृष्टी भागात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून आम्ही शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मात्र आमदार शिरसाट यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी नो कॉमेंट्स म्हणत प्रश्नाला बगल दिली. शिवसेना शिंदे गटातील खानापूर मतदार संघाचे आमदार अनिलराव बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. आमदार बाबर यांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री शिंदे आज विटा येथे आले होते.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सांगली, कोल्हापुरातील अतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाणार आहे. एकही शेतकरी वंचित राहणार नाही  तसेच शहर भागामधील काही लोकांचे पुनर्वसन केले असून आणखी गरज पडल्यास त्या त्या भागातील पूर परिस्थिती पाहून त्याचे योग्य नियोजन करू, कोणालाही अडचण येऊ देणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले.

दरम्यान, 15 ऑगस्ट चे ध्वजारोहण सध्या बिनखात्याच्या मंत्रांच्या हस्ते होत आहे, अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, टीका करणे विरोधकांचे कामच आहे, आमचं काम आहे सरकार चालवण्याचं ते आम्ही करीत आहोत. आम्ही लोकांच्या हिताचे एका महिनाभरात किती निर्णय घेतले ते बघा, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.मात्र आमदार शिरसाट यांच्या मंत्री पद न मिळाल्याच्या नाराजीच्या नव्या ट्विट्स आणि भूमिकेबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी नो कॉमेंट्स म्हणत प्रश्नाला बगल दिली.

हेही वाचलंत का?
SCROLL FOR NEXT