Latest

इम्तियाज जलील यांच्यात धमक असेल तर त्यांनी अमरावतीतून लढावे : नवनीत राणा

अनुराधा कोरवी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : धमक असेल तर अमरावतीत येऊन लढावे आणि आपल्याला लोकसभा निवडणुकीत पाडून दाखवावे असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी एमआयएमचे संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना मंगळवारी (दि. २०) रात्री एका कार्यक्रमात बोलताना दिले.

संबंधित बातम्या 

खासदार नवनीत राणा यांनी संसदेत 'इस देश मे रहना है तो जय श्रीराम बोलना पडेगा' अशा आशयाचे विधान केले होते. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत पाडण्याची भाषा केली होती. यावरून खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील हळदी कुंकू कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर एकेरी शब्दात प्रखर टीका केली आहे.

इम्तियाज जलील यांच्यासारखे किती आले आणि किती गेले असे म्हणत त्यांनी ते ओवेसी यांचे ऐकत असल्याची टीका केली. इम्तियाज जलील यांच्यात धमक असेल तर त्यांनी अमरावतीतून लढावे आणि निवडून येऊन दाखवावे असे आव्हान दिले आहे. इम्तियाज जलील संभाजीनगरमध्ये यावेळेस कसे निवडून येतात हेच मी पाहते. संभाजीनगरमधील नागरिक अशा लोकांना निवडून येऊ देणार नाही आणि संभाजीनगरला डाग लावणार नाही असेही त्या म्हणाल्या.

खासदार नवनीत राणा यांनी एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांच्यावरही टीका केली. तुमच्यासारखे किती आले आणि किती गेले. मी महिला असून पदर खोसून मैदानात उभी आहे. तुमच्यासारख्याला घाबरत नाही, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान त्यांनी राम मंदिर आणि बाबरी मज्जिद यावरूनही आपल्या संबोधनात भाष्य केले. त्यात त्या म्हणतात, बाबरी जिवंत आहे आणि जिवंत होती. तर मी त्यांना एकच सांगते, राम भगवानचे मंदिर जिवंत होते, जिवंत आहे. जिवंत राहील आणि त्यामुळेच ते मंदिर आज तेथे बनले आहे असे त्या म्हणाल्या.

SCROLL FOR NEXT