Latest

नाशिक : चित्र बदलतंय.., जुन्या प्रथांना छेद देत वीरभगिनींचे “हळदी-कुंकू’

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशधर्म निभावणारे वीरजवान शहीद झाल्यानंतर वीरपत्नीच्या वाट्याला आलेले वैधव्य यामुळे मकरसंक्रांतीनंतर साजरा केल्या जाणाऱ्या हळदी-कुंकू समारंभांना त्यांना सामील करून घेतले जात नाही. या जुन्या प्रथांना छेद देत वीरनारी वीरमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कालिका मंदिर येथे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते.

यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागांतून महिला आल्या होत्या. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष मनीषा मराठे, माजी नगरसेविका अर्चना जाधव, भारत श्री स्नेहा कोकणे पाटील, मिस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी, सीमा दिवटे, उमा कुलकर्णी, मथुरा जाधव, सुवर्णा खाडे, संस्थेच्या अध्यक्षा रेखा खैरनार उपस्थित होत्या. भारत श्री काेकणे पाटील म्हणाल्या, मी अशी महिला आहे जिच्या नावापुढे सौ नाही श्री लागत. शेतकरी कुटुंब ते बॉडीबिल्डिंगपर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. प्रास्ताविकात रेखा खैरनार म्हणाल्या, जवान शहीद झाल्यानंतर सरकारच्या वतीने केवळ घोषणा दिल्या जातात पण पुढे त्या कुटुंबाचे काय होते? गेल्या २३ वर्षांपासून वीरपत्नी म्हणून जगताना शहीदांच्या कुटुंबांना मदत करणे, वीरपत्नी म्हणून समाजात त्यांना स्थान मिळवून देणे, नोकरीत वीरनारींना मदत करणे यासारखी अनेक कामे संस्थेच्या वतीने केली जात आहेत.

समाजातील चित्र बदलतंय..

जुन्या प्रथेपरंपरेनुसार हळदी-कुंकूसारख्या समारंभांना केवळ सवाष्ण म्हणजे विवाहित महिलांना मानसन्मान, हळदी-कुंकू, वाण दिले जात होते. इतर विधवा महिलांना हळदी-कुंकू दिले जात नव्हते. या जुन्या प्रथा मोडीत काढत आता समाजातील विधवा, घटस्फोटित महिलांनादेखील हळदी-कुंकवासारख्या समारंभांना सामील करून घेतले जात असल्याचे बदलते चित्र शहरापुरता तरी बघायला मिळत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT