नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
गिरणा धरणावरील मासेमारी व्यवसाय करण्याचा पहिला हकक स्थानिकांचाच असून याठिकाणी कोणताही व्यापाऱ्यांना फिरकू देउ नका, असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी मच्छीमार आदिवासी बांधवांचा महामेळावा दरम्यान केले.
आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत गिरणा धरण येथील अवैधरीत्या होत असलेल्या ठेकेदारी विरोधात स्थानिक मच्छीमार आदिवासी बांधवांचा महामेळावा पार पडला. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील गिरणा धरण परिसरातील जवळपास २५ गावांमधील आदिवासी मच्छीमार बांधव या मेळाव्यासाठी उपस्थित होते. धरण परिसरातील वार्ही बर्डी येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात जवळपास ५ ते ६ हजार आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी आदिवासी बांधवांसाठी मोफत फिरता दवाखाना अंतर्गत डोळे तपासणी तसेच इतर आजार तपासणी, मोफत औषधे तसेच सर्व शासकीय सुविधा कार्यालया मार्फत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कॅम्प लावण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक तसेच गिरणा धरण परिसरातील आदिवासी बांधव उपस्थित होते.
मेळाव्याप्रसंगी आमदार कांदे यांनी सांगितले की, एखादा ठेकेदार किंवा परराज्यातून माणूस येणार आणि तो येथे व्यवसाय करणार, आणि आम्हाला उघड्यावर टाकणार. हे मी कदापी होऊ देणार नाही. आमच्या मासेमार बांधवांच्या जाळे किंवा ज्या ज्या वस्तू जप्त केल्या असतील त्या २ ते ४ दिवसात परत द्याव्यात. अन्यथा त्या बिलाल ठेकेदाराचे गोडाऊन नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. तसेच यावेळी आजपर्यंत मच्छीमार आदिवासी बांधवावर खोटे गुन्हे दाखल केलेल्या गुन्ह्यात, फिर्यादी आसलेले अन्वर भाई यांनी व्यासपीठावर येऊन सर्व आदिवासी बांधवांची माफी मागत गुन्हे मागे घेत असल्याचे जाहीर केले.