नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जनावरांची वाहतूक करण्यासाठी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम १२५-ई च्या तरतुदीनुसार वाहनांच्या बांधणीमध्ये अपेक्षित बदल करावा. तसेच वाहनांच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना घेऊनच जनावरांची वाहतूक करावी, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांची वाहतूक होत असते. अशा वेळी प्राण्यांच्या संरक्षित वाहतुकीसाठी वाहतूकदारांनी नियमांचे पालन करून जनावरांची वाहतूक करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. जनावरांची वाहतूक करण्याआधी संबंधितांनी वाहनांमध्ये अपेक्षित बदल करून परवाना घ्यावा, तसेच प्राणी संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण किंवा ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया किंवा केंद्र शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी, व्यक्ती किंवा प्राणी कल्याण संस्थेने दिलेले प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र सोबत नसल्यास वाहतूकदाराने जनावरांची वाहतूक करण्यास नकार द्यावा. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.
हेही वाचा :