Latest

Nashik Onion News : दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल ठप्प

गणेश सोनवणे

लासलगाव / नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कांद्याच्या प्रश्नावरून विविध व्यापारी, शेतकरी संघटना यांनी सोमवार (दि. २१) पासून सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील उलाढालीला बसला आहे. १६ बाजार समित्यांमधील व्यवहार थंडावल्याने तब्बल ५० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. कांद्याचे लिलाव सुरळीत करावे अन्यथा परवाने निलंबित करण्याचा इशारा उपनिबंधकांनी दिला असला, तरी १९ ऑगस्टपर्यंत निर्यात शुल्क निर्णय होण्यापूर्वी ज्यांची निर्यात नोंदणी झालेली आहे अशा कांद्याला यातून वगळण्यात आल्याशिवाय लिलाव होणार नसल्याची भूमिका व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी घेतली आहे. Nashik Onion News

दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद असल्याने उलाढाल थंडावली आहे. आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या लासलगाव बाजार समितीसह इतर समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याने उलाढाल ठप्प झाली आहे. एकट्या लासलगाव बाजार समितीमध्ये १० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. काही बाजार समित्यांमध्ये आलेल्या शेतकऱ्यांची चक्कर वाया जाऊ नये यासाठी त्यांच्या कांद्याचे लिलाव करण्यात आले. यात विंचूर उपबाजार आवारात लिलाव होऊन कांद्याला किमान ८००, तर कमाल २,३६० आणि सरासरी २१५० रुपये प्रतिक्विंटलभाव मिळाले. शनिवारच्या तुलनेत बाजार भावात किरकोळ ५० रुपये प्रतिक्विंटलने घसरले होते. Nashik Onion News

आंदोलन असेच सुरू राहिले, तर विक्रीसाठी तयार केलेला कांदा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर साठवणूक केल्यानंतर बाजारात एकदम कांदा आला, तर त्याची किंमत घसरून पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT