नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे. पाऱ्यातील घसरणीमुळे निफाडला ४.४ अंश सेल्सियस तापमान आल्याने निफाडकरांना अशरक्ष: हुडहुडी भरली आहे. तर नाशिकमध्ये ८.६ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले आहे. (North Maharashtra Cold)
महाराष्ट्रात त्यातही विशेष करून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. द्राक्षपंढरी असलेल्या निफाडला यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी ४.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे अवघ्या तालुक्यात थंडीची लाट पसरली असून द्राक्षमणी फुटण्याची शक्यता वाढल्याने शेतक-यांनी द्राक्षबागेत शेकोट्या पेटवल्या असून काहींनी द्राक्षांना कापड गुंडाळले आहे. शक्य तशा पध्दतीने शेतकरी द्राक्ष बाग वाचवण्याच्या धडपडीत दिसून येत आहे. त्यामुळे थंडीच्या कडाक्यात शेतक-यांची ससेहोलपट मात्र होत आहे. पहाटे पडणाऱ्या दवबिंदूमुळे द्राक्षबागांना धोका वाढल्याने शेतकरी चिंतातुर झालेला दिसत आहे. (North Maharashtra Cold)