Latest

नाशिक : अवकाळी पावसाच्या हजेरीने द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

निलेश पोतदार

चांदवड ; पुढारी वृत्तसेवा

चांदवड शहरासह परिसरातील गावात आज (शनिवार) रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास अवकाळी पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे उघड्यावर पडलेले कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली.

चांदवड शहरासह परिसरातील गावांमध्ये द्राक्ष बागांचे लिलाव सुरू झाले आहेत. या पावसामुळे द्राक्ष पिकांना तडे जाणार असल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. वडनेरभैरव परिसरात लेट असलेल्या द्राक्षबागांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रफळावरील द्राक्ष बागांचे तसेच कांदा पिकांचे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे.

मागील डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात कांदा, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकर्‍यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्‍यात आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उरलेसुरले सर्व निसर्ग हिरावून घेतो की काय या चिंतेने शेतकरी चिंताग्रस्‍त बनला आहे.

SCROLL FOR NEXT