नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आपल्या भाजप प्रवेशाचा मराठवाड्यात काँग्रेसला काय फटका बसला, हे येणाऱ्या निवडणुकीतच समजेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात हा अपघात असू शकतो, चौकशीत ते उघड होईलच, मात्र तो घातपात कसा यावर शंका उपस्थित करणे, त्यांनी हा घातपात असल्यास तसे पुरावे द्यावेत, असे म्हटले आहे. अपघात मी समजू शकतो, रोज अपघात होऊ शकतात, अपघात होणे ही गंभीर बाब आहे. Ashok Chavan on Nana Patole
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील दुसऱ्या सभेच्या निमित्ताने आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसमधून संजय निरुपम बाहेर पडले असे असताना आम्हीच त्यांना बाहेर काढले, असा दावा करणाऱ्या नेत्यांचा त्यांनी समाचार घेतला. काँग्रेस नेतृत्वाने आताही काँग्रेसमधून लोक बाहेर का जात आहेत. याचा विचार करणे गरजेचे आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला. Ashok Chavan on Nana Patole
रामटेकची ही सभा केवळ एका मतदारसंघापुरती नसून विदर्भात त्याचा प्रभाव जाणवेल. मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यात निवडणूक असल्याने त्या भागात देखील महायुतीला चांगले वातावरण असल्याचे सांगितले. जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी यांना मान्यता असल्याने जनतेत त्यांच्या नेतृत्वाला पसंती आहे. राज ठाकरे यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग आहे. त्यामुळे त्यांचा महायुतीला फायदाच होईल. कमळ या चिन्हावर लढण्यास त्यांनी दिलेला नकार या संदर्भात छेडले असता त्यांची स्वतंत्र विचारधारा व त्यांचा स्वतंत्र पक्ष असल्याने तो त्यांनी विचार केला असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घातपात होणे हा निष्कर्ष कुठून काढला? काही पुरावा आहे का? असा सवाल केला. काँग्रेसने घातपात असल्याचा आरोप भाजपवर केला असून स्वतः नाना पटोले यांनी पोलिसांत तक्रार करीत या अपघाताची चौकशी व्हावी, असे म्हटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपघात कुठलाही वाईटच असतो, उगीचच आरोप करू नये, आम्ही विरोधकांची देखील काळजी घेतो, ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
हेही वाचा